Sunday, July 6, 2025

वीर गाव, रम्यवीर गाव, रम्य त्या आठवणी ८ (पहाट !!)

 वीर गाव, रम्यवीर गाव, रम्य त्या आठवणी ८ (पहाट !!)


पूर्वी आमच्या लहानपणी, कोकणात आम्ही पहाटे उठायचो त्यावेळी उजडत नाही तर आमची काकू म्हशीच्या गोठ्यात दूध काढायला जायची, त्यावेळी आमच्याकडे एक म्हैस आणि तिचे रेडकू असायचे. बाजूच्या यमूवहिनीकडे कामवाली सीताबाई घिरटीवर भाकरीचे पीठ दळत असायची. आई लवकर आंघोळ करून देवघरात साफ सफाई करून देवांच्या पूजेची सिद्धता करायची. एरवी पक्षांच्या किलबिलाटा ने धुंद झालेला  परसव,  चैत्रामध्ये कोकिळेच्या मधुर परंतु उच्च स्वरानि दणाणून जायचा. ताई सकाळच्या न्याहरीची तयारी करायची. 


तेवढ्यात बाहेर पडवीमध्ये झोपाळ्या वर बसलेल्या बाबांचा ( आम्ही त्यांना मामा म्हणत असू) आवाज यायचा, "अहो, विष्णुपंत आले आहेत, म्हटले कॉफी ठेवा". ही बाबांची सकाळ पासूनची दुसरी कॉफी असायची.


विष्णुपंत वीरला एकटेच यायचे, त्यांच्या घरच्या मंडळींना वीरची आवड नव्हती. ते कोर्टात नोकरीला होते. मे महिना आणि दिवाळी मध्ये त्यांना भरपूर सुट्या मिळायच्या. दादरच्या डबलरूम मध्ये त्यांचा जीव गुदमरायचा. कोर्टाला सुटी लागली की हे हमखास वीरला यायचे. बरेच वेळा आमच्याकडे जेवायला असायचे. 

एकदा विष्णुपंत आले की त्यांच्या वडिलांबरोबर गप्पा रंगायच्या मग देवपूजा दोन तास पुढे ढकलली जायची. आमच्या वडिलांना सुद्धा वीर गाव फार आवडायचा. म्हणायचे आमची नाळ येथे पुरली आहे. 


आम्ही कच्ची बच्ची मंडळी शाळेत जायची घाई नसल्यामुळे जास्तीत जास्त वेळ झोपायला कसे मिळेल याकडे आमचा कल असायचा. एरवी मुंबईत शाळेमुळे नाईलाजाने लवकर उठायला लागायचे, त्यात मे महिन्यात मुंबईमध्ये पाण्याचा तुटवडा असल्यामुळे शेजारच्या चाळीतून पाणी भरायची वेळ यायची, त्यामुळे वडील सर्वांची रवानगी १५ एप्रिल लाच वीरला करायचे. मामा (बाबा) १५ मे ला कोर्टाला सुट्टी पडली की यायचे. तेथपर्यंत आमचा रिझल्ट लागलेला असायचा. आम्हाला धास्ती असायची की मामा शाळेत जाऊन आपला रिझल्ट आणतील की नाही. मामाना विचारले की रिझल्ट काय लागला तर कधीच सांगत नसत. म्हणायचे आता जून ला शाळेत जाशील तेव्हा बघ. सम्पूर्ण सुटी ते आम्हाला आनंदात घालवू द्यायचे. 


सकाळी ९ वाजले की आम्हाला मेद्याच्या डोहावर जाण्याचे वेध लागले असायचे. कसे बसे ताईने केलेला गावठी तांदळाचा गुरगुट्या भात आणि त्याबरोबर मेतकूट किंवा फोडणीची मिरचीचे चार घास पोटात टाकले की झाली न्याहारी. त्यावेळी आता सारखे न्याहारीला पोहे, उपमा, इडली, ढोकळा सारखे पदार्थ म्हणजे काय हे सुद्धा माहिती नव्हते. पण त्याबद्दल कधी काहीच वाटले नाही. म्हणतात ना अज्ञानात आनंद असतो आणि ज्ञानी माणूस दुःखी असतो कारण तो माझ्याकडे काय आहे यापेक्षा मला काय मिळत नाही याचा नेहमी विचार करतो, म्हणून दुःखी असतो.


२ तास डोहात मनसोक्त डुंबल्यानंतर स्वारी घरी यायची. येथपर्यंत अर्धा दिवस  कसा जायचा कधीच कळले नाही.


आता अलीकडे शहरात काय किंवा गावी सुद्धा पहाटे उठायचे सोडाच पण सकाळी ७ नंतर उठल्या उठल्या कुटुंबातील बहुतेक सदस्य आपापले मोबाईल घेऊन एकमेकांना किंवा ग्रुपवर शुभ सकाळ, शुभ दिवस, शुभ वाढदिवस अशा  अनेक शुभेच्छांचा भडिमार करतात. मग थोड्या वेळाने सुविचारांचा रतीब लागतो आणि ते सुविचार वाचून मानवाची अध्यात्मिक आणि मानसिक प्रगती बघून उर भरून येते आणि खरोखरच विचारशक्ती दिल्यामुळे मानव जगातील सर्वात श्रेष्ठप्राणी असल्याची खात्री पटते!!.


 मग एखादी वाईट बातमीची पोस्ट आली तर लगेच श्रद्धांजली, RIP वगैरे टाकून आपली सामाजिक बांधिलकी मोबाईलवरच जपली जाते. त्यात एखादी मदत कोणी मागितली असेल तर तत्परतेने तो मेसेज पूर्वी कधी आला आहे किंवा त्या मेसेजची मुदत किंवा सत्यतेची शहानिशा न बघता ( कारण अशा मेसेजेसना तारीख किंवा मुदत देण्याचे भान पोस्ट टाकणारच  काय पण इतर कोणी नेटकरी कधीही ठेवताना मी बघितला नाही), तात्काळ फॉरवर्ड करून आपण समाजाला कशी मदत करतो  हे स्वतःलाच समजावले जाते.मग एकेक फॉरवर्ड सुरू होतात आणि आपण किती जागरूक अहोत हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. आणि काहि ठिकाणि तर राजकीय रणकंदन माजते. हे होईपर्यंत सकाळचे ९.३० वाजतात आणि पोटात कावळे ओरडायला लागले की मग घरातील गृहिणी झोमॅटोवर ऑर्डर देण्यापूर्वी प्रत्येकाचा चॉईस विचारून ब्रेकफास्ट ऑर्डर देते.


खरे सांगू मी सिमला, कुलू, मनाली एवढेच काय भारतातील अनेक थंड हवेच्या आणि निसर्ग सौंदर्याच्या ठिकाणी फिरलो आणि राहायलो पण वीर च्या सुट्टीतील मज्जा तेथे कधीच आली नाही. आमचा गाव आडगाव आहे म्हणून तर तो वर्दळी पासून लांब आहे. आणि तो आहे तसाच मला आवडतो. त्याला काही फार मोठे आर्थिक मूल्य नसेल पण निसर्ग, शांतता, समाधान  आणि बरेच काही आहे जे आर्थिक मूल्यापेक्षा जास्त महत्वाचे वाटते.


माधव भोळे 

No comments:

Post a Comment

वीर गाव, रम्यवीर गाव, रम्य त्या आठवणी ८ (पहाट !!)

 वीर गाव, रम्यवीर गाव, रम्य त्या आठवणी ८ (पहाट !!) पूर्वी आमच्या लहानपणी, कोकणात आम्ही पहाटे उठायचो त्यावेळी उजडत नाही तर आमची काकू म्हशीच्य...