Thursday, June 30, 2022

वीर गाव - रम्य त्या आठवणी (९)

वीर गाव - रम्य त्या आठवणी (९) आज मी लिहिणार आहे ते जवळजवळ 45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या वीर गावा समोर खडपे काजुर्ली गाव आहे. खडपे काजूर्ली गाव हे दोन गावांचे मिळून बनले आहे. खडपे आणि काजूर्ली. पैकी काजूर्ली गाव वीर गावच्या बरोबर समोर येते आणि खडपे गाव हें पिलवली गावाच्या समोर येते. वीर आणि काजूर्ली यांच्या मधून कापशी नदी वाहते, ती पुढे भातगाव येथे तिसंग ला मिळते. तिसंग म्हणजे तिहेरी संगम. माखजन वरून येणारी शास्त्री नदी जी पुढे संगमेश्वर तालुक्यात वहाते ती तिसंग येथे मिळते, अबलोली येथून कापशी नदी येते ती खडपे काजूर्ली भातगाव करत तिसंग येथे मिळते आणि जयगड वरून येणारी जयगड खाडी तिसंग येथे मिळते म्हणून याला भातगाव तिसंग असे म्हणतात. तेथे पाणी फारच खोल आहे. खडपे येथे आमचे एक नातेवाईक कै. विठ्ठलराव पुरुषोत्तम जोशी रहात असत. ते माझ्या वडिलांचे मामे भाऊ. हे विठ्ठल राव मोठे हिकमती व्यक्ती. पूर्वी ह्या जोशी मंडळीपैकी काही मंडळी बडोदा, गुजरात येथे राहत आणि काही मंडळी खडपे येथे राहत. विठ्ठलराव त्याकाळी बी ए पास झाले होते. बडोदा येथे त्यांचे कसलेसे दुकान होते. परंतु आपल्या वडिलांच्या पश्चात गावची शेती आणि भिक्षुकी सांभाळण्यासाठी ते बडोदा सोडून खडपे येथे राहायला आले. त्यांच्या पत्नी कै वत्सलबाई या सुद्धा माझ्या दुसरीकडून नातेवाईक होत्या, त्या माझ्या लांबच्या चुलत भगिनी. त्यामुळे वीर येथे मुक्कामाला आलो की एक दिवस खडपे ट्रिप असायचीच. तेथिल वातावरण बघून आनंद वाटायचा. विठ्ठलरावाना शेतीची खूप आवड. त्यांची कैक एकर शेती दोन्ही गावात पसरली होती. पुरोहित असल्यामुळे गावात दरारा होता. गडी माणूस स्वतःहून त्यांना भेटायला येत असत. घरासमोरच कापशी नदी असल्यामुळे उन्हाळा सोडला तर बाकी महिने नदीला पाणी गोड असायचे. विठ्ठलरावानी घराजवळ मळ्यातच अननस, भुईमूग, ऊस, दोडकी, पडवळ सारख्या फळभाज्या यांची लागवड केली होती. त्यांना घरी लागणारे गोडेतेल स्वतःच्या भुईमुगाच्या पासून बनवायचे. शेतीला पूर्वी उंडी ने पाणी दिले जायचे.( उंडी म्हणजे नदीतून उपसा करून शेतात पाणी ओतण्यासाठी तयार केलेली एक तरफच). विठ्ठठराव अत्यंत हौशी आणि दिलदार माणूस. ते आमचे पुरोहित सुद्धा होते. पूर्वी यजमान उपाध्ये या नात्याला लोक फार मान देत. एक वर्षी मी खडपे येथे जाण्याचा बेत आखला. त्यावेळी मी नुकताच कॉलेजला गेलो होतो. आमच्या शेजारचा सुरेश सुद्धा खडपे येथे यायला उत्सुक होता. वत्सलबाई त्याच्या मावशी लागत. वीर ते खडपे चालत अंतर 1 तास म्हणजे साधारण 7 किलोमीटर असेल. आदल्यादिवशी घरच्यांना सांगून दुसऱ्यादिवशी सकाळी लवकर उठून मी आणि सुरेश मार्गस्थ झालो. रस्ता खाडीमार्गे असल्याने तेथे गेल्यावरच आंघोळ करणार होतो. प्रथम वीर ब्राह्मणवाडी ते जावलेवाडी कातळ असा डोंगराळ भाग चढलो. त्याकाळी जावले वाडीतील बहुतेक घरे केम्बळारु आणि दगडमातीच्या भिंतींनी बनवलेली होती. (केम्बळारू म्हणजे गवताने शाकारलेली. आता प्रत्येक घर चिरेबंदी आणि वर पत्राच्या झाली आहेत. घरकुल योजनेची आणि शेतकऱ्यांच्या कष्टाची कृपा). पुढे कातळावरून चालत डाव्याबाजूला शेमखडी चे पाणी लागते तेथे डोंगर उतरायला सुरुवात केली. शेमखडी म्हणजे तेथे कातळात झऱ्यातून पाणी येते. गरीब कुणबी मंडळी त्या डोंगराळ भागात राहत त्यांना ते पाणी पिण्यासाठी उपयोगी येई. गरिबी इतकी होती की नारळाच्या करवंटी ने अल्युमिनियम चे किंवा मातीचे हांडे भरले जात होते. तेथील थंडगार पाणी प्यालो. ( आज त्या भागात राष्ट्रीय नळपाणी योजना येऊन रानपाट मधील धरणाचे पाणी पाईप ने त्यांच्या घरी आले आहे. त्याआधी विहीर योजने अंतर्गत तेथे कातळामध्ये भलीमोठी विहीर खणून ते पाणी टाकीमार्गे सर्वांना नंबर लावून मिळतं असे). पुढे शेमखडीचा डोंगर उतरून आम्ही वीरच्या मळ्यात आलो. तेथे वीर पिलवली सीमेवर एक छोटेसे झोपडे होते तेथे एक वृद्ध बाई एकटीच राहत असे, ती झोपडी पार करून साधारण 1 मैल दीड मैल चालत पिलवली च्या ब्राह्मण वाडीजवळ आलो. पिलवलीच्या ब्राह्मणवाडीच्या बरोबर समोर ह्या विठ्ठल रावांचे घर आहे. मध्ये खाडी आहे. पिलवलीच्या ब्राह्मण वाडीतील कांतूच्या घरासमोर उभे राहून हाक मारली की खडपेकरमंडळी उत्तर देतात. त्याप्रमाणे त्यांना दोन तीन हाका मारल्या आणि विठ्ठल रावांचा पुतण्या माधव जोशी समोर आला. त्याने आम्हाला ओळखले. त्यावेळी खाडीला पार नव्हता.( पार म्हणजे जशी समुद्रात भरती आणि ओहोटी दिवसातून प्रत्येकी दोन वेळा येते तशी खाडीला अनुक्रमे पाणी जास्त कमी होते. पाणी कमी झाले की पार पडला असे म्हणतात.). त्यामुळे खाडीच्या पाण्यातून पलीकडे जाणे क्रमप्राप्त होते. माधव जोशी नेहमीप्रमाणे हाफ पॅन्ट वरच असल्याने तो पटकन पाण्यात उतरला आणि पोहत पलीकडे पिलवली मध्ये आम्ही उभे होतो तेथे आला. माधव तब्येतीने दणकट होता. त्याने मला पटकन खांद्यावर घेतले आणि जिथपर्यंत पाणी कमी होते तेथपर्यंत नेऊन सोडले आणि म्हणाला आता इथून चालत जा पलिकडे. खाडी असल्यामुळे चपला हातात होत्या. खाडीचा अंदाज नव्हता. खाडी मध्ये अनेक ठिकाणी कालवे असतात हे माहिती नव्हते. ( कालवे म्हणजे एक प्रकारचे पाण्यातील प्राणी जे दगडाला शिंपल्यासारखे घरे बांधून त्यात राहतात. या शिपल्याना धार असते.) नेमके कालव्यावर पाय पडल्यामुळे पायाला भेगा पडल्या. बाहेर आलो तर पायातून रक्त येत होते. थोड्या वेळाने माधव आमचे सामान आणि सुरेशला घेऊन घरी आला. सुरेश तब्येतीने मजबूत असल्याने माधवने त्याला खांद्यावर न घेता हाताला धरून पाण्यातून पोहोत पलीकडे आणले. माधवने माझ्या कापलेल्या पायांवर कोकमाचे तेल दिव्यावर गरम करून लावले. ( कोकमाचे तेल एरवी ते घट्ट लोण्याच्या गोळ्यासारखे असते). खडपे येथे घरी गेल्यावर वत्सलबाई नि आम्हाला मऊ भात मेतकूट ची न्याहारी दिली आणि आम्ही अंघोळ करून स्थिरावलो. सुरेशला गप्प बसवत नव्हते. त्यानी बघितले की मळ्यात अननस, भुईमूग, ऊस सारखे त्याच्या आवडीचे पदार्थ आहेत. त्याने प्रथम एक अख्खा अननस फस्त केला. नंतर बचकभर शेंगदाणे खाल्ले तेव्हड्यात वत्सलबाई नि आपल्या गड्या करवि सांजण करण्यासाठी बरका फणस झाडावरून काढुन घेतला एक छोटा आणि एक मोठा. त्यातील एक अख्खा बरका फणस त्याने मावशीच्या नकळत कधी फस्त केला ते मला कळलेच नाही. तेथपर्यंत दुपारचा एक वाजला होता. नेहमीप्रमाणे विठ्ठलराव आपले पौरोहित्य आवरून घरी आले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत वैश्वदेव आणि देवाला नैवेद्य दाखवून दुपारचे सागर संगीत भोजन झाले. संध्याकाळी आम्ही परत मळ्यात गेलो होतो. सुरेशने परत सकाळचाच दिनक्रम केला. भुईमुगावर यथेच्छ ताव मारला आणि वर अख्खा अननस पोटात गेला. रात्री दिवे लागणिच्या वेळी मी पुढिल दारी असताना अचानक माधव, माधव अशी हाक ऐकू आली. बघतो तर सुरेश पोट धरून ओरडत होता. मी त्याला विचारले काय झाले तर म्हणाला पोट दुखत आहे, कळा येत आहेत. त्याने मला पोटाला तेल लावून देण्याची विनंती केली. ती माझ्या आयुष्यातील पहिली सुश्रुशेची संधी. मला शक्य होईल तेव्हडे केले. मावशीने त्याला ओवा आणि गरम पाणी दिले. रात्रभर सुरेश विव्हळत होता. त्या खेडेगावात त्याकाळी कुठला डॉक्टर? . रात्री बारा साडेबाराला सुरेशला खूप उलट्या झाल्या. त्यात त्याची सहनशक्ती थोडी कमीच. जरा दुखले की बोंब मारायचा. सकाळी उठल्यावर सुरेशने हट्टच धरला माधव तू मला उचलून वीरला घेऊन चल. सुरेश चा देह माझ्या दुप्पट आणि मी बारीक. त्यात 7 / 8 किमी कोणाला खांद्यांवर घेऊन जाणे मस्करी आहे का? मला वाटले कुठून बुद्धी झाली आणि खडप्याला आलो. मी त्याला कसेबसे समजावले. म्हटले आजचा दिवस काढ आणि पूर्ण लंघन कर. पण तो कसला तरी थोडे जेवलाच. संध्याकाळी 4 वाजता त्याला बरे वाटले आणि आम्ही खडप्यावरून परतीचा प्रवास सुरु केला. सुरेशला चालण्याशिवाय पर्याय नव्हता. 6 वाजेपर्यंत आम्ही वीर ब्राह्मणवाडी मध्ये आलो. सुरेशला त्याच्या आईच्या ताब्यात दिला आणि हुश्श केले. त्याकाळी खाडीमार्गे सुद्धा वीर बंदर पर्यंत यायला होड्या होत्या परंतु परत वीर बंदरातून 2 ते 2.5 किमी चालू तेव्हा कुठे ब्राह्मण वाडी येते म्हणून सर्व लोक डोंगर मार्गानेच येत असत. आता वीर ते खडपे जायचे झाल्यास हे पहिले मार्ग आहेतच शिवाय वीर-वहाळ-आबीटगाव-मूर्तवडा-अबलोली-खडपे असा रस्ता मार्ग आहे आणि विठ्ठल रावाच्या दरवाजात गाडी जाते. आता विठ्ठल राव, वत्सलाबाई यातील कोणीही हयात नाहीत. त्यावेळी माणसे गरीब पण मनाने श्रीमंत होती. सध्या तेथे विठ्ठलरांवांचे चिरंजीव डॉ आनंद जोशी राहतात. माधव भोळे

No comments:

Post a Comment

वीर गाव, रम्यवीर गाव, रम्य त्या आठवणी ८ (पहाट !!)

 वीर गाव, रम्यवीर गाव, रम्य त्या आठवणी ८ (पहाट !!) पूर्वी आमच्या लहानपणी, कोकणात आम्ही पहाटे उठायचो त्यावेळी उजडत नाही तर आमची काकू म्हशीच्य...