Friday, July 1, 2022

वीर येथील श्री लक्ष्मी मल्लमर्दन अर्चाविधी उत्सव मे 2022.

वीर येथील श्री लक्ष्मी मल्लमर्दन अर्चाविधी उत्सव मे 2022. 2019 साली कार्तिकी उत्सवात ठरल्याप्रमाणे, करोना काळानंतर, वीर येथील श्री लक्ष्मी मल्लमर्दनाच्या मूर्तीची देवत्तत्वे दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी विधिवत उतरवून दि. 7 जानेवारी 22 रोजी मूर्तीच्या वज्रलेप प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली ती दि. 14 मार्च 22 रोजी पूर्ण झाली. दिनांक 21 आणि 22 मे 2022 रोजी झालेल्या अर्चाविधी उत्सव सोहळ्यासाठी साधारणपणे 15 दिवस आधी वीर येथे प्रत्यक्ष तयारीला सुरवात झाली. मंदिर आवारातील पेव्हर ब्लॉक साफ करणे, गाभाऱ्यात श्रीगणपतीची नवीन पंचधातूंची मूर्ती आणि श्री शंकराची पिंडी बसविणे, सम्पूर्ण गाभारा, मंदिर साफ करून धुवून काढणे, देवापुढे केळीचे मखर व तोरण बांधणे, जेवणाची भांडी धुवून वाळत टाकणे, स्वछता गृहाची दुरुस्ती, पाण्याची व्यवस्था, मंदिरात कापडी छत बांधणे, मंडप डेकोरेशन वगैरे. दि. 18 मे पर्यंत यातील बहुतेक कामे पूर्ण झाली होती आणि मंडप डेकोरेशनचे काम सुरू होते. दिनांक 19 मे रोजी अचानक रात्रभर जोरात पाऊस पडला आणि मंडपात लावलेल्या ताडपत्रीवर पाणी साचून पाण्याच्या वजनाने मंडपाचा काही भाग कोसळला. त्यामुळे दिनांक 21 / 22 मे रोजीच्या उत्सवातील अडचणींबद्दल धाकधूक निर्माण झाली. दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता गावातील वंत प्रमुख सर्वश्री योगेश वीरकर ( चौथाई वंत), दीपक वीरकर ( केशववंत), सीताराम वीरकर, प्रकाश वीरकर, महादेव हरी वीरकर ( यशवंत वंत), संजय भोळे ( नवेलेवंत तर्फे), श्रीराम आणि सुयोग वीरकर ( चौसोपी वंत) यांनी श्री. श्रीकृष्ण वीरकर, ध्रुव भोळे आणि राम भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री लक्ष्मी मल्लमर्दन देवतेला श्रीफळ ठेवून प्रार्थना करून दि. 21 पासून सुरू होणारे अर्चाविधी कार्य निर्विघ्न पणे पार पाडण्यासाठी श्रीलक्ष्मी मल्लमर्दन देवतेला प्प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या घुमटाच्या दुरूस्तीमुळे दूषित झालेल्या वास्तूच्या शुद्धीकरणासाठी सर्वश्री श्रीकृष्ण वीरकर, ध्रुव भोळे, राम भोळे, सुयोग पटवर्धन आणि वैभव पटवर्धन यांचे हस्ते उदक शांती विधी करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 मे रोजी सकाळी कामाला लवकर सुरवात करता यावी म्हणून आदल्यादिवशी ( 20 मे ला) यजमान सौ. व श्री. योगेश वीरकर यांच्या हस्ते पुण्याहवाचन करण्यात आले तसेच अर्चा विधीला लागणारी सम्पूर्ण मांडणी करण्यात आली. देऊळ तिनही बाजूने उघडे असल्यामुळे रात्री श्रीकृष्ण वीरकर, दीपक वीरकर, ध्रुव भोळे, सुरेश बागवे यांनी जागता पहारा ठेवला. प्रत्यक्ष विधीला दि. 21 मे ला सकाळी ठीक 8 वाजता सुरवात झाली. यजमान श्री. योगेश वीरकर सपत्नी हजर होते. तेथून पुढील धार्मिक विधी सुरू झाले. श्री. श्रीकृष्ण वीरकर यांच्याबरोबर वेदमूर्ती श्री. विलास भोळे, श्री. ध्रुव भोळे, श्री. प्रमोद भोळे, श्री. रामचंद्र भोळे, श्री. अमेय भोळे, श्री. संजय भोळे, श्री. दीपक जोशी ( वाघांबे), श्री. मालशे ( वहाळ), श्री. वैभव पटवर्धन ( पेढे परशुराम), श्री. सुयोग पटवर्धन (पेढे परशुराम) अशी वेदशास्त्र सम्पन्न मंडळी अर्चा विधी साठी नियोजीत केली होती. विशेष म्हणजे यातील बरीच मंडळी तरुण होती. त्यांनी तीन पर्यायाने अर्चा केली. दि. 21 रोजी पहिल्या दिवशी दोन पर्यायांचे हवन होऊन देवाला निद्रिस्त ( जलाधीवास) करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना दुपारी 2 वाजता भोजन देण्यात आले. मूर्तीचे कारागीर श्री. दीपक ओतारी व त्यांचे सुपुत्र या उभयतांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच मंदिराचे पुजारी श्री. श्रीकृष्ण वीरकर यांच्या आजवरच्या निरलस सेवेबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. दि. 21 मे रोजी सुमारे 350 ते 400 मंडळी वीर इथे प्रत्यक्ष उपस्थित होते. अनेकांना यायची इच्छा होती परंतु मे महिन्यामुळे रेल्वे तिकिटे उपलब्ध न झाल्याने अनेक मंडळींनी उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली. वीर गांवातील माहेरवाशिणी, ग्रामस्थ त्यांचे नातेवाईक एवढेच नव्हे तर ज्यांचा कधी काळी वीर गांवाशी संबंध आला होता अशी सर्व मंडळी हौशीने या सोहळ्याला हजर होती. भक्तांची हौस म्हणून रात्री आरत्या आणि मंदिराभोवती 4 भोवत्यांचा अत्यंत उत्साहात व बहारदार कार्यक्रम झाला. आरती करण्यापूर्वी मंडळांचे अध्यक्ष श्री. सीताराम वीरकर, श्री. श्रीकृष्ण वीरकर आणि इतर कार्यकारिणी सदस्य यांचे हस्ते या उत्सवानिमित्त प्रकाशित केलेल्या स्मरणिकेचे उद्घाटन करण्यात आले. रात्रीचे भोजन झाल्यानंतर रत्नागिरी मधील सुप्रसिद्ध गायक मंडळी सर्वश्री विशारद गुरव, चिपळूण ( संवादिनी आणि गायन), विपुल निमकर, चिंद्रवळे ( गायन ), वीरेंद्र जोशी, वाघांबे ( पखवाज ), प्रथमेश शहाणे ( तबला ), यांच्या सुमधुर आणि दर्जेदार गायनाने सम्पूर्ण परिसर भारावून गेला होता. दुसऱ्या दिवशी 22 तारखेला सकाळी ठीक 8 वाजता धार्मिक विधीला सुरुवात होऊन जलाधीवासातील निद्रिस्त देवतांना मंत्रजागरानी जागे करण्यात आले. त्यानंतर विधीवत पूजा होऊन पुढील सर्व प्रक्रियेला पूर्णाहुतीने समाप्त करण्यात आले आणि देवांच्या मूर्तीची पुनर्प्राणप्रतिष्ठा झाल्याचे घोषित करण्यात येऊन ही मूर्ती उपस्थितांना दर्शनासाठी खुली करण्यात आली. दुपारी महाप्रसादाचे भोजन झाले ( यासाठी सर्वश्री मदन, मोहन, प्रवीण चंद्रकांत वीरकर, विलेपार्ले या बंधूंनी विशेष प्रायोजकत्व केले.) यानंतर स्मरणिका आणि प्रसाद घेऊन मंडळी आपापल्या घरी परतायला सुरवात झाली. रात्री मंदिरात आरत्या आणि मंत्रपुष्पांजली आणि भोजन होऊन दोन दिवस मोठया उत्साहात सुरु झालेल्या अर्चा विधी सोहळ्याची सांगता झाली. माधव भोळे
श्री लक्ष्मी मल्लमर्दन प्रासादिक मंडळ आणि उत्सव मंडळातर्फे.

No comments:

Post a Comment

वीर गाव, रम्यवीर गाव, रम्य त्या आठवणी ८ (पहाट !!)

 वीर गाव, रम्यवीर गाव, रम्य त्या आठवणी ८ (पहाट !!) पूर्वी आमच्या लहानपणी, कोकणात आम्ही पहाटे उठायचो त्यावेळी उजडत नाही तर आमची काकू म्हशीच्य...